Google ads

Ads Area

गुरुपौर्णिमानिमित्त मराठी निबंध| Gurupaurnima nimitt marathi nibandh

 गुरुपौर्णिमानिमित्त मराठी निबंध| Gurupaurnima nimitt marathi nibandh

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्य परंपरा ही खूप महत्त्वाची मानले जाते .प्राचीन काळापासून गुरु-शिष्य संबंध हे आपण जाणत आलेलो आहे. या गुरुशिष्य संबंधांमध्ये आपला चांगला संबंध असावा यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आपले गुरु आणि शिष्य यांचे नातेसंबंध यावर निबंध हा लिहीत आहोत. गुरु-शिष्य म्हटलं की आपल्याला आठवतात ते श्रीकृष्ण आणि अर्जुन, स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस ,सॉक्रेटिस आणि प्लेटो ,राम आणि हनुमान असे हे आपल्यासमोर उदाहरणे उभी राहतात. 

गुरु हा आपला मार्गदर्शक असतो आपले चुकते पाऊल सावरणारा जो असतो तो आपला गुरू असतो.

 गुरु हा केवळ आपण प्राचीन इतिहासामध्ये अभ्यासल्याप्रमाणे ऋषीमुनी, साधुसंत म्हणजेच ते गुरु आहेत असे नाही ते तर होतेच;पण आपल्या अवतीभवती जे सज्जन लोक आहेत त्याच पद्धतीने हे ही गुरु आपले होऊ शकतात. 

आध्यात्मिकदृष्ट्या  गुरु असला पाहिजे असे नाही ,तर तो कोणत्याही क्षेत्रात मिळणे गरजेचे असते .गुरुशिवाय आपण आपला उद्धार करू शकत नाही ,म्हणून खेळात, शिक्षणात, व्यवसायात, परमार्थात ,व्यवहारात अन्य क्षेत्रात आपल्याला गुरु आवश्यक असतो .म्हणून अशा गुरूला आपण नेहमी नतमस्तक होऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे विचार आचरणात आणून आपला मार्ग अनुसरला तर आपला नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहत नाही .


आज संपूर्ण जगभर गुरुपौर्णिमा ही साजरी जरी होत असली तरी केवळ भाषण देणे ,निबंध लिहिणे आणि गुरूंना वंदन करणे एवढेच मर्यादित गुरुपौर्णिमा न राहता ही गुरुपौर्णिमा व्यापक दृष्टीने पाहिल्यास  गुरुविषयी असणारी श्रद्धा, आदर, आपुलकी ,जिव्हाळा ,ओढ ही असली पाहिजे. तर त्या गुरुपौर्णिमेला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होऊ शकेल ."गुरु हा प्राण विसावा माझा" या उक्तीनुसार  आपणास गुरुविषयी खूप तळमळ असली पाहिजे. गुरुची भेट घेण्यासाठी आपलं मन चातक पक्षाप्रमाणे अतुर झालं पाहिजे .या तळमळीतून गुरू आपल्यावर कृपाशीर्वाद नेहमीच ठेवत असतात. 


"गुरु हा संत कुळीचा राजा"  हा गुरु आपणाला कशा पद्धतीने तारतो हेच महत्त्वाचे असते. म्हणून शिष्याने आपला गुरुकृपा प्राप्त करून घेणे गरजेचे असते.


श्रीगुरुसारखा असता पाठीराखा |इतरांची रेखा कोण करी

राजयांची कांता काय भीक मागे| मनाच्या जोगे सिद्धी पावे

कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला|काय उणे त्याला सांगे जो जे

 ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो  |आता उद्गारलो गुरुकृपे


ज्ञानेश्वर महाराज यामध्ये म्हणतात गुरुकृपा असली तर कोणतीच अपेक्षा राहणार नाही .सगळे गुरुकृपेने आपले मनोरथ पूर्ण होणार . 

 आजची परिस्थिती फार वेगळी आहे पूर्वीच्या काळी गुरूगृही जाऊन त्या ठिकाणी दीक्षा घेतली जात होती; पण आजची परिस्थिती ही बदलली आहे. आपणही काळानुरूप बदललो असलो तरीही आपल्या मनातील भावना जी आहे ती तशीच ठेवणे गरजेचे आहे.


 गुरु म्हणजेच भगवी कपडे परिधान केलेला ,लांब दाढी असलेला किंवा गळ्यात मोठमोठ्या माळा असलेले असे गुरु आजकाल दिसणार नाहीत. तरीही आपल्याच अवतीभोवती आपलेच मित्र ,अप्तेष्ट ,नातेवाईक यामध्ये सुद्धा आपल्याला गुरूची जाणीव करून देणारे अनेक मार्गदर्शन करणारे गुरु आपणाला मिळत असतात; फक्त आपली दृष्टी गुरूच्या नजरेतून समोर आली पाहिजे .गुरु जरी आपला हा मार्गदर्शक असला तरी आपण ही त्याप्रमाणे गुरुनिष्ठा ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपला मार्ग पत्करणे गरजेचे आहे ;तरच आपणाला गुरुकृपेचे फळ चाखायला मिळणार असते. याचा अत्यानंद हा खूप मोठा असतो.

माझीये मनीचा जाणोनिया भाव|तो करी उपाव गुरुरावो

तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनातील भाव ओळखून आपल्यासाठी गुरू कृपा व्हावी एवढी निष्ठा आपली गुरूवर असायला हवी 

 गुरु वाणी म्हणजे अमृतवाणी आपली निष्ठा असली पाहिजे. तरच आपण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुविषयी आदर, निष्ठा आणि श्रद्धा जपून ठेवू .हाच अनमोल संदेश मी आपणासमोर मांडत आहे .


आज गुरुपौर्णिमेनिमित्त उत्साह दिसत आहे हाच उत्साह असाच नवीन येणाऱ्या पिढीला आणि सगळ्या जणांना आपल्या गुरुविषयी असणारी श्रद्धा, निष्ठा, आपुलकी, प्रेम, ओढ,भक्ती याची जाणीव करून देणारा हा असा हा मोठा सण आहे त्यानिमित्त  आपणही गुरुवर श्रद्धा ठेवावी आणि त्यातूनच नकळतपणे आपले हित साधून घेण्याचा प्रयत्न करावा .


आजकाल गुरू हे पारखून केले जातात त्याच कसोटीत ते गुरूजी राहिले नाहीत तर दुसरा गुरु होतो .अशी गुरुविषयी असलेली श्रध्दा दिसते .


घालुनिया भार राहिलो निश्चन्ति|निरविले संती विठोबासी

लावूनिया हात कुरुवाळीला माथा| सांगितले चिंता न करावी||

आपण जर गुरूवर भार घातला तर ते आपला उद्धार करणारच असतो .तेवढी निष्ठा असणं गरजेचं आहे .

खरं सांगायचं तर गुरु हा पारखून करु नका जे जे तुम्हांला हवे ते ते आपणास शिकून घेणं गरजेचं आहे .आजच्या आधुनिक युगात सर्वगुणसंपन्न असे गुरू मिळणे कठीण जरी असले तरी सगळेच गुण वाईट नसतात .एखाददुसरा गुण सोडून दिला तर त्यातून आपल्याला भरपूर काही शिकता येऊ शकेल असा माझा विश्वास आहे .आपली सुद्धा गुरूला सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असली पाहिजे तरच गुरुकृपा शक्य आहे .म्हणून आपल्या मनातून गुरुविषयीची श्रद्धा अखंड राहो .

 समस्त गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area